मुंबई : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर करण्यात आली असून ही राज्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी आहे. याशिवाय २०१९च्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या १२ लाख ७१ हजार लाभार्थ्यांनाही कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली असल्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली. कृषिमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग करीत संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली.