दृश्यमानता प्रमाणापेक्षा खूपच कमी असल्यामुळे बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, असा प्राथमिक निष्कर्ष हवाई अपघातांची तपास करणाऱ्या संस्थेने (एएआयबी) काढला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळानजीक २८ जानेवारीला अपघात झाला. या दुर्घटनेत पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास ‘एएआयबी’ यांच्याकडे सोपविण्यात आला होता. अपघाताला एक महिना पूर्ण होत असतानाच शनिवारी या संस्थेने प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला.
‘एएआयबी’ने आपल्या २२ पानांच्या अहवालात म्हटले आहे की, ‘बारामती विमानतळाकडे येताना वैमानिकांनी दृश्यमानतेविषयी विचारले होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून ३००० मीटर असल्याचे उत्तर मिळाले. लॅण्डिंगला परवानगी देताना हवा साधारण असल्याचे नियंत्रण कक्षाने म्हटले होते. मात्र, व्हीएफआर विमानासाठी दृश्यमानता प्रमाणापेक्षा कमी होती. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या डाव्या बाजूला विमान जमिनीवर आदळले.







