कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून, नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अतिशय चिंतेत आहेत. कांद्याच्या प्रश्नांवर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत असून कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारा जिल्हा आहे. जानेवारी महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे १,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले होते. आता, तर त्यापेक्षाही कमी दर मिळत असून, कांदादर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.







