काकिनाडा जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २१वर पोहोचला आहे. समरलकोटा परिसरातील वेटलापालेम गावातील परवानाधारक फटाका कारखान्यात शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात नऊ महिलांसह वीस जणांचा मृत्यू झाला होता.
सूर्या श्री फायरवर्क्सचा मालक अदाबला श्रीनिवास याचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वीस मृतदेहांची ओळख पटली आहे. शवविच्छेदनानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या दहा कामगारांवर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी एक कामगार समरलकोटा येथील खासगी रुग्णालयात, एक सार्वजनिक आरोग्य केंद्रात, तर उर्वरित आठ जण काकीनाडा सरकारी रुग्णालयात (जीजीएच) उपचार घेत आहेत. त्यांच्यापैकी तिघे जण ९० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. इतरांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी जखमी कामगारांची विचारपूस केली.








