Jammu And Kashmir Government Takes Over Schools Related To Banned Jamaat e islami
Jammu Kashmir News: ‘जमात’शी संबंधित शाळांवर ताबा, दहा जिल्ह्यांतील 295 शाळांचे व्यवस्थापन सरकारकडे
महाराष्ट्र टाइम्स•
Government takes over Schools: जम्मू-काश्मीरमधील जमात-ए-इस्लामी या संघटनेशी संबंधित २१५ शाळांवर सरकारने शनिवारी ताबा मिळवला. या शाळांमधील ५१ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण विभागाने या शाळांच्या व्यवस्थापन समित्या ताब्यात घेऊन पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे काही राजकीय पक्षांनी स्वागत केले, तर काहींनी निषेध नोंदवला आहे.
वृत्तसंस्था, श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या दहा जिल्ह्यांतील जमात-ए-इस्लामी या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित शाळा शनिवारी सरकारने ताब्यात घेतल्या. या शाळांच्या व्यवस्थापनांवर ताबा मिळवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही बाधा न आणता शांततेत आणि सुरळीत पार पडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जमात-ए-इस्लामी आणि त्यांच्या फलाह-ए-आम ट्रस्ट यांच्याशी संबंधित २१५ शाळा ताब्यात घेण्याचे आदेश जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी दिले होते. या शाळांमध्ये ५१ हजार विद्यार्थी शिकत असून, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलिस पथके शनिवारी सकाळी या शाळांमध्ये दाखल झाली. सरकारी पथकांनी या शाळांची कागदपत्रे तपासली, पायाभूत सुविधांचा आढावा घेतला आणि शाळांतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.केंद्रीय गृहमंत्रालयाने २८ फेब्रुवारी २०१९ आणि २७ फेब्रुवारी २०२४ रोजी जमात-ए-इस्लामी या संघटनेला बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागाने २१५ शाळांच्या व्यवस्थापन समित्या ताब्यात घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी म्हटले होते. तसेच या शाळांच्या पडताळणीनंतर तिथे नव्या व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते.
दरम्यान, ‘जमात-ए-इस्लामी’च्या माजी सदस्यांनी स्थापन केलेल्या ‘जस्टिस अॅण्ड डेव्हलपमेंट फ्रंट-जेके’ या संघटनेने या निर्णयाचा निषेध केला आहे. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या ‘विश्वासघाताच्या इतिहासा’चे हे वेदनादायी स्मरण असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘हे स्वागतार्ह पाऊल आहे. याआधी आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता सर्वकाही सुरळीत होईल, असे वाटते’, अशी प्रतिक्रिया हनफिया इस्लामिया इन्स्टिट्यूटमधील शिक्षक मोहम्मद इशाक यांनी व्यक्त केली.
शाळा ताब्यात घेण्याच्या निर्णयावर पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, अपनी पार्टी या पक्षांनी टीका केली आहे. हा निर्णय लज्जास्पद असल्याचे सांगत पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख व आमदार सज्जाद लोन यांनी सरकारवर टीका केली. ‘नॅशनल कॉन्फरन्सने सत्तेत आल्यानंतर नेहमीच ‘जमात-ए-इस्लामी’ला लक्ष्य केले आहे’, असे पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटले आहे.