Two Students Drown During Ganapati Immersion In Nampur
विसर्जनादरम्यान दोघांचा बुडून मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
खासगी क्लासच्या गणपती विसर्जनासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील नामपूर येथे घडली. अथर्व दीपक पगार (वय १७, रा. उत्तराणे) आणि प्रसाद दादाभाऊ वाघ (वय १७, रा. नामपूर) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने नामपूरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
नामपूर येथील एका खासगी क्लासमधील बारावीचे काही विद्यार्थी दुपारच्या सुमारास गणपती विसर्जनासाठी मोसम नदीवरील बंधाऱ्यावर गेले होते. या वेळी अथर्व आणि प्रसाद हे दोघे पाण्यात उतरले असता बुडू लागले. उपस्थितांनी त्यांच्या बचावासाठी प्रयत्न केले; मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर मालेगाव येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने शोधमोहीम राबवून दोन्ही विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी नामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.अथर्वचे वडील कमलाकर पगार यांनी दिलेल्या जबाबात क्लास संचालक विवेक अशोक पाटील यांनी पालकांची परवानगी न घेता विद्यार्थ्यांना गणपती विसर्जनासाठी नेल्याचा आरोप केला आहे. या वेळी क्लासमधील दोन शिक्षिका आणि दहा ते पंधरा विद्यार्थी सोबत असल्याचेही जबाबात नमूद केले. क्लासचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.