‘देशाच्या आर्थिक आणि राजनैतिक सामर्थ्याची कसोटी पाहणाऱ्या अनेक बाह्य धक्क्यांमधून यशस्वीपणे मार्ग काढून भारत एक लवचीक जागतिक शक्ती म्हणून उदयास आला आहे,’ असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी केले. या वेळी बोलताना त्यांनी पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा संदर्भ दिला.
‘आयआयएम, रायपूर’च्या १५ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. करोना महामारी, सध्या सुरू असलेला जागतिक संघर्ष, हवामान बदल ही तिन्ही आव्हाने गेल्या दशकातील व्यत्यय होती. भारत या धक्क्यांमधून खंबीरपणे बाहेर पडला आहे,’ असे जयशंकर म्हणाले. या तिन्ही घटकांनी दैनंदिन जीवनावर कल्पनेपलीकडे परिणाम केला आहे. करोना महामारीने जीवन बदलले असले, तरी सध्याच्या संघर्षाने दूर असणाऱ्या समाजांवरही खोलवर परिणाम केला आहे. जागतिकीकरण रुजल्याचे हे द्योतक आहे. देशाने जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे, असेही जयशंकर म्हणाले.


