यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण मिळवून मिळवण्यासाठी पुढील दोन दिवसांत धावपळ करावी लागणार आहे. जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आणि स्पर्धा अहवाल विहित मुदतीत सादर करावेत, असे निर्देश जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिले आहेत. यासाठी आता खेळाडू विद्यार्थ्यांनाच धावाधाव करावी लागणार आहे.
शासनाच्या सुधारित नियमावलीनुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील खेळाडूंना परीक्षेमध्ये जादा गुण दिले जातात. यासाठी संबंधित क्रीडा संघटनांनी विद्यार्थ्यांच्या शिफारसीसह संपूर्ण अहवाल ९ एप्रिलपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे सादर करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया एक एप्रिलपासून सुरू झाली आहे. मुदतीत अहवाल सादर न झाल्यास विद्यार्थी सवलत गुणांपासून वंचित राहू शकतात, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
क्रीडा सवलत गुणांच्या प्रस्तावासाठी संघटनांना धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे; तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी राज्य संघटनेच्या संलग्नतेचे पत्र आवश्यक असेल. त्याचबरोबर इतरही पत्रे जोडण्यास सांगितली आहेत. क्रीडा सवलत गुणांची प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान व्हावी, यासाठी संबंधित क्रीडा संघटना, शाळांचे मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

