‘कॅल्शियम कार्बाइड’चा वापर करून पिकवलेले आंबे बाजारात येण्याची शक्यता असून, अन्न व औषध प्रशासनाने शहरात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
कॅल्शियम कार्बाइडमधून निघणाऱ्या ‘ॲसिटिलीन’ वायूमुळे आंबा लवकर पिकतो. मात्र, असे आंबे खाल्ल्याने उलटी, जुलाब, पोटाचे विकार आणि दीर्घकाळ सेवनाने मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. अन्न सुरक्षा कायद्यानुसार यावर बंदी असून, नाशिकमध्ये असे आंबे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर एफडीएच्या पथकांकडून लक्ष ठेवले जात आहे.
सध्या नाशिकच्या बाजारपेठेत कोकणातील (रत्नागिरी, देवगड) हापूससोबतच कर्नाटक हापूसची मोठी आवक आहे. दिसायला सारखाच असल्याने अनेक विक्रेते कर्नाटक आंबा ‘रत्नागिरी हापूस’ असल्याचे सांगून चढ्या दराने ग्राहकांच्या माथी मारतात. कर्नाटक आंबा ५०० ते ७०० रुपये डझन असताना, रत्नागिरीचे नाव देऊन तो १२०० ते १५०० रुपयांना विकले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.


