साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण आठवड्यावर येऊन ठेपला आहे. यानिमित्त नाशिकसह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. पितृपूजनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘ करा-केळी ’ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. .
वाढत्या उष्म्याचा विचार करून पूर्वजांची तृष्णा शमावी, या श्रद्धेतून मातीच्या ‘करा-केळी’चे (पाण्याचे कुंभ) पूजन केले जाते. यामध्ये पाणी भरून त्यासोबत आंबा, खरबूज यांसारख्या हंगामी फळांचा नैवेद्य दाखविला जातो.
शहरातील मुख्य बाजारपेठ, रविवार कारंजा, पंचवटी आणि उपनगरांमध्ये या वस्तू मुबलक प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. ‘करा-केळी’ची जोडी साधारणतः १५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
पंचांग गणनेनुसार रविवारी (दि. १९) दिवसभर तृतीया तिथीचा प्रभाव आहे. यामुळे पारंपरिक पूजन व दानासाठी हा दिवस मुख्य असेल. जरी या तिथीचा अंशात्मक भाग २० एप्रिलपर्यंत जात असला, तरी उदयतिथीनुसार १९ एप्रिललाच हा उत्सव साजरा करणे शास्त्रशुद्ध ठरेल,असे मार्गदर्शन धर्मशास्त्र अभ्यासकांनी केले आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा ‘अबूझ मुहूर्त’ मानला जातो. म्हणजे या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी पंचांगाचा आधार घेण्याची विशेष गरज नसते. हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो.


