शहरासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. रविवारी (दि. १२) कमाल तापमान चाळिशीच्या उंबरठ्यावर पोहोचले. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असताना कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
शनिवारी (दि. ११) तापमानात तब्बल ६.३ अंशांची झेप नोंदवली गेली होती. गुरुवारी नोंदवलेले ३२.५ अंश सेल्सिअस तापमान शनिवारी थेट ३८.८ अंशांवर पोहोचल्याने ही वाढ विक्रमी मानली गेली. सलग दोन दिवसांत तापमानात झालेल्या या तीव्र वाढीमुळे उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. रविवारी तापमानाने ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंतचा टप्पा गाठला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे पाहायला मिळत असून नागरिकांनी आवश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास प्राधान्य दिले आहे.


