नाशिकमधील श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर न्यासाच्या विश्वस्तांच्या निवडीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. ‘नाशिक जिल्हा प्रधान न्यायाधीशांनी राबवलेली निवडप्रक्रिया अपारदर्शक, बेकायदा व मनमानी पद्धतीची होती’, असा आरोप करत त्यांनी केलेली पाच विश्वस्तांची निवड रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
‘न्यासाच्या योजनेप्रमाणे दोन पदसिद्ध विश्वस्त वगळता उर्वरित पाच विश्वस्तांची निवड ही जिल्हा न्यायाधीशांकडून होते. या निवडप्रक्रियेत त्यांनी धर्मादाय आयुक्तांशी सल्लामसलत करणे अभिप्रेत असताना तसे केले नाही. शिवाय निवडप्रक्रिया अत्यंत घाईघाईत व अपारदर्शक पद्धतीने करण्यात आली. त्यामुळे १२ मार्च रोजी नाशिक जिल्हा प्रधान न्यायाधीशांनी जाहीर केलेली ॲड. राहुल खुताडे, विष्णू वारुंगसे, डॉ. राजेंद्र वराडे, दिलीपकुमार देशमुख व डॉ. कांचन देसले यांची विश्वस्त पदावरील निवड रद्द करावी. तसेच मुलाखतीच्या टप्प्याच्या पुढे प्रक्रिया पुन्हा राबवून योजनेप्रमाणे पाच विश्वस्तांची निवड करण्याचे निर्देश द्यावेत’, अशी विनंती अमित जाधव यांनी ॲड. कविता विजापुरे यांच्यामार्फत रिट याचिकेद्वारे केली आहे.
‘ संपूर्ण निवडप्रक्रिया दिखाऊ होती आणि निवड पूर्वनियोजित होती, असे समोर आले. तसेच पारदर्शकतेचा व निष्पक्षतेचा पूर्णपणे अभाव असल्याचेही उघड झाले’, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.



