राज्यातील रिक्षा परवान्यांच्या पडताळणीदरम्यान परवानाधारकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करणाऱ्या मिरा-भाईंदरच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला (आरटीओ) बिष्णोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर शहरात रिक्षा परवान्यांची पुनर्तपासणी केली जात असून, या प्रक्रियेत संबंधित चालकाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का, याचीही खातरजमा केली जात आहे. आरटीओ प्रसाद नलावडे यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून, ‘मी बिष्णोई टोळीचा माणूस बोलत आहे. मराठी सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्या’, अशी धमकी दिली. नलावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.



