चिलाकालादोना : आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयम येथे एका हलक्या व्यावसायिक वाहनाची टँकरशी धडक होऊन झालेल्या अपघातात पाच महिलांसह आठ भाविक ठार झाले. गुरुवारी झालेल्या या दुर्घटनेत दहा जण जखमी झाले आहेत.
हे सर्व भाविक श्री राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी मंत्रालयम येथे जात होते. सुमारे २० प्रवासी असणारे हे वाहन टँकरला धडकले. आठ भाविक जागीच मृत्युमुखी पडले, तर काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे यमिगानूरचे उपअधीक्षक एन. भार्गवी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. राष्ट्रीय महामार्ग १६७वर पहाटे ३ वाजता हा अपघात झाला. चालकाला डुलकी हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना आधी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, तर गंभीर जखमींना अधिक उपचारांसाठी कुर्नूल शासकीय सामान्य रुग्णालयात (जीजीएच) पाठविण्यात आले.








