जिल्ह्यातील १२६ केंद्रांवर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नऊ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात हजारो सेवेकर् यांनी सामुदायिक गुरुचरित्र वाचनामध्ये सहभाग नोंदवला.
या सप्ताह कालावधीत प्रत्येक सेवेकरी जी सेवा करतो त्याची नोंद करण्यात येत असते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला त्या सेवेचा हिशेब स्वामी चरणावर अर्पण केला जातो. यात प्रामुख्याने सामुदायिक स्वामी चरित्र पारायण, दुर्गा सप्तशती, नवनाथ, भागवत, विष्णुसहस्रनाम, रुद्र इत्यादी ग्रंथाचे सामुदायिक वाचन तसेच सामुदायिक श्री स्वामी समर्थ जप, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, नवार्ण मंत्र इत्यादी मंत्राचा सामुदायिक जप हा कोटीच्या पटीत झाला व पारायणाची संख्याही हजारांच्या पटीत होती. गुरुमाऊली यांच्या आदेशाने भारत मातेच्या संरक्षणार्थ मोठ्या संख्येने दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करण्यात आले. स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी पहाटे स्वामींच्या मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. सकाळी भूपाळी आरतीनंतर सत्यदत्त पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व सेवेकरांनी आपल्या घरून वरण, भात, भाजी, पोळी, गोड पदार्थ, फळे इत्यादी वस्तू आणल्या. त्यातूनच स्वामींना सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. त्यानंतर २४, २५, २६, २७ एप्रिल रोजी होणारा संस्कार महोत्सव, मूल्य संस्कार एक्सपो या उपक्रमांची माहिती; तसेच २६ एप्रिल रोजी होणारा रोजगार मेळावा व महिलांसाठी बचत गट प्रशिक्षण व बचत गट नोंदणी होणार आहे, याची सर्वांना माहिती देण्यात आली. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली, अशी माहिती मराठवाडा विभागीय प्रतिनिधी संदीप देशमुख यांनी कळवली आहे.







