पाकिस्तान अद्यापही दहशतवादी गटांचे आश्रयस्थान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times

इस्लामाबाद : अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याच्या प्रतिमेचा फायदा घेऊन आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा नव्याने घडवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे. मात्र, वास्तव हे आहे, की पाकिस्तान दहशतवादी संघटनांसाठी पोषक भूमी आणि आश्रयस्थान म्हणून कार्यरत राहिला आहे, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेला भीषण दहशतवादी हल्ला हा एकाकी घटना म्हणून पाहता येणार नाही, तर तो हिंसाचाराच्या एका पद्धतशीर आणि दीर्घकालीन यंत्रणेचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेली ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या यंत्रणेच्या केंद्रस्थानी आहे. पाकिस्तान तिचा वापर करीत आहे. या गटांनी केलेल्या कारवाया या प्रदेश अस्थिर करणे, तणाव कायम ठेवणे आणि शांततेच्या कोणत्याही शक्यता नष्ट करणे या व्यापक रणनीतीचा भाग आहेत. या संदर्भात दहशतवाद हे केवळ दबावाचे साधन नसून एका धोरणाचा संरचनात्मक भाग आहे, जो सातत्याने आणि हेतुपुरस्सर हिंसाचार निर्माण करत राहतो.

'युरेशिया रिव्ह्यू'मध्ये स्टाइकू दिमित्रा यांनी लिहिले आहे, ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष उलटले आहे. या हल्ल्यात २६ निरपराध लोक मारले गेले. यामुळे केवळ मानवी हानी झाली नाही, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये भीती आणि अस्थिरतेचा खोल ठसा उमटला. धर्माच्या आधारावर वेगळे काढून पीडितांची थंड डोक्याने हत्या केल्याने दहशतवादाची मानवी किंमत आणि राजकीय हिंसाचाराचे साधन म्हणून नागरिकांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात असल्याचे उघड झाले. आता पाकिस्तान अमेरिका-इराण तणावातील मध्यस्थाच्या कथित भूमिकेच्या बाह्य मान्यतेचा फायदा घेऊन आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा नव्याने घडवण्याचा प्रयत्न करत असला, तरी मूळ वास्तव अपरिवर्तित आहे. पाकिस्तान दहशतवादी संघटनांसाठी पोषक भूमी आणि आश्रयस्थान म्हणून कार्यरत राहतो. या संघटना केवळ टिकून राहत नाहीत, तर पुनरुज्जीवित होतात आणि प्रादेशिक स्थैर्य व सुरक्षेला सातत्याने खिंडार पाडतात,' असेही त्या म्हणाल्या.