तेलंगणात ४७ माओवाद्यांची शरणागती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तेलंगणात ४७ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांनी ३२ शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केली. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे घडलेल्या घटनेवर राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अमृतपाल सिंग याला पुन्हा दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले.

47 maoists surrender in telangana

हैदराबाद : तेलंगणात ४७ भूमिगत माओवाद्यांनी शनिवारी ३२ शस्त्रांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये हेमला इयथू उर्फ विज्जा याचाही समावेश आहे. तो माओवाद्यांच्या दंडकारण्य विशेष झोनल कमिटीचा सदस्य व दक्षिण बस्तर विभागीय कमिटीचा प्रभारी होता. मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाने प्रभावित होऊन या माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तेलंगणचे पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी दिली.

चौकशीची मागणी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे विश्वकर्मा समाजातील मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘प्रत्येक वेळी पीडित व्यक्ती दलित किंवा गरीबच का असते?’ असा सवाल करून त्यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची आणि पीडितेच्या कुटुंबाला त्वरित न्यायाची मागणी शनिवारी केली.

अमृतपाल पुन्हा तुरुंगात

दिब्रुगड (आसाम): ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख आणि खासदार अमृतपाल सिंग याला अजनाळा पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात पुन्हा दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे.संपल्यानंतर शनिवारी त्याला अजनाळा येथील न्यायाधीश पलविंदर सिंग यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.