नवी दिल्ली : ‘दहशतवादाची केंद्रे ही यापुढे न्याय्य शिक्षेच्या कचाट्यातून सुटू शकणार नाहीत, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले आहे,’ असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले. सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला दिलेला हा इशारा असल्याचे मानले जाते.
किर्गिजस्तानची राजधानी बिश्केक येथे ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या परिषदेला राजनाथ यांनी संबोधित केले. देशांकडून प्रायोजित सीमापार दहशतवाद हा एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वावरच घाव घालतो. त्यामुळे ‘एससीओ’ने त्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच दुटप्पी भूमिकेला स्थान असू नये, असे ते म्हणाले. परिषदेला चीन, रशिया आदी देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित होते.





