‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकार महिलांना राजकीय आरक्षण मिळवून देण्यास कटिबद्ध आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी हाणून पाडले; परंतु महिलांना संसद आणि विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून मोदी सरकार मागे हटणार नाही’, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी दिली.
महालक्ष्मी रेसकोर्स येथील सभागृहात फेडरेशन ऑफ इंडस्ट्री चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाच्या (फिक्की) मुंबई विभागीय महिला संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आठवले बोलत होते. ‘भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नमोदींच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेने जागतिक १०व्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर झेप घेत विलक्षण प्रगती केली आहे. पंतप्रधानांचे ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या धोरणामुळे देशाचा सर्वांगिण विकास होत आहे’, असे त्यांनी यावेळी नमूद केले. ‘मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था निश्चितच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येईल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






