वाढत्या उष्म्यामुळे त्वचाविकारांमध्ये वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. ‘अंगावर पुरळ येणे, घामोळे, त्वचा कोरडी किंवा अतिलाल होणे, चट्टे उमटणे, दीर्घकाळ त्वचाविकाराची ही लक्षणे राहतात. वैद्यकीय सल्ला न घेता मलम लावणे, औषधे घेणे टाळायला हवे,’ असे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. सुहास साळुंखे यांनी सांगितले. तर, लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींमध्ये विविध प्रकारच्या पोटविकारांच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. उष्म्यामुळे अपचन, पोटदुखी, अतिसार यांसह ॲसिडिटीमुळे उलट्या होणे, चक्कर येण्यासह तीव्र डोकेदुखी यांसारखा त्रास वाढलेला दिसतो.




