रिलायन्स कम्युनिकेशनच्या (आरकॉम) विरोधात बँक फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणाच्या तपासांतर्गत ३,०३४ कोटी रुपयांच्या टाच कारवाईअंतर्गत उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुंबईतील फ्लॅट आणि त्यांचे पुत्र जय अंशुल अंबानी यांची संयुक्त मालकी असलेल्या खंडाळा येथील फार्महाउसवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली.
‘मालमत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि बँका व जनहिताचे रक्षण करण्यासाठी, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तात्पुरती टाच आणली आहे,’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. आरकॉम रिलायन्स ही अनिल अंबानी समूहाची (आरएएजी) कंपनी आहे. ‘टाच आणलेली काही मालमत्ता अनिल अंबानी यांची आई कोकिळाबेन धीरुबाई अंबानी यांची आहे,’ असे प्रवक्त्यांनी सांगितले.






