आपल्या संविधानाने देशाला अत्यंत भक्कम लोकशाही व्यवस्था दिली आहे. याच व्यवस्थेच्या ताकदीमुळे गुजरातमधील रेल्वेस्थानकावर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. नगरसेवक होण्याचाही विचार न केलेला माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. येथे बसलेल्या कोणत्याही युवाने मनाशी पक्के ठरविले, तर आपले संविधान आणि लोकशाही व्यवस्था त्यालाही मुख्यमंत्री बनविल्याशिवाय राहणार नाही. ही संविधानाची ताकद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जनमंथनतर्फे आयोजित ‘मंथन फॉर युवा’ या उपक्रमाच्या रेशीमबाग मैदानावर रविवारी आयोजित समारोप समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपस्थित हजारो जेन-झी युवांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. प्रश्नांची उत्तरे दिली. राजकीय प्रवासातील आठवणी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन मी राजकारणात आलो. ज्या विचारधारेच्या पक्षात काम करत होतो, त्या पक्षाची सत्ता येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.
काँग्रेस पक्षाचा जमिनीशी कोणताही संपर्क उरलेला नाही. केवळ टीव्हीवर प्रासंगिक राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.