Indias Secondary Cricket Team In Asian Games Considered
एशियाड क्रिकेटमध्ये भारताचा दुय्यम संघ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यास भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्राधान्य आहे. या स्पर्धेच्या कालावधीत भारतीय संघातील खेळाडूंसाठी चांगले हॉटेल कसे आरक्षित होईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मैदानावरील सुविधा चांगल्या असण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषद प्रयत्नशील असल्याची टिप्पणी बीसीसीआयमधील अन्य एका पदाधिकाऱ्याने केली असल्याचे वृत्त आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दुय्यम संघ पाठवण्याचा विचार भारतीय क्रिकेट बोर्ड ( बीसीसीआय ) करीत आहे. क्रिकेट स्पर्धेसाठी असलेल्या सुविधांवर भारतीय क्रिकेट बोर्ड; तसेच आशियाई क्रिकेट परिषद समाधानी नाही, त्यामुळे दुय्यम संघाबाबत विचार होत असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.आइची-नागोया (जपान) येथे आशियाई क्रीडा स्पर्धा (एशियाड) १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यातील पुरुषांची क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान, तर महिलांची स्पर्धा १७ ते २२ सप्टेंबरदरम्यान होईल. ‘एशियाडमधील क्रिकेट स्पर्धेसाठी असलेल्या सुविधांवर बीसीसीआय; तसेच आशियाई क्रिकेट परिषद नाराज आहे. बीसीसीआयचे निरीक्षक लवकरच जपानला जातील. तेथील सुविधा चांगल्या नसल्यास दुय्यम संघ पाठवण्याचा नक्कीच विचार होऊ शकतो. क्रिकेट मैदानावरील ड्रेसिंग रुम तंबूत आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृह या ड्रेसिंग रुमपासून सुमारे पाचशे मीटर दूर आहेत. हे नक्कीच चांगले नाही. त्याचबरोबर खेळाडूंच्या मुक्कामासाठी असलेल्या हॉटेलमधील रुमही खूपच लहान आहेत. किट बॅग ठेवल्यास वावरास जागाच राहणार नाही,’ याकडे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
गतआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन्ही क्रिकेट संघांनी सुवर्णपदक जिंकले होते. भारताचे दोन्ही संघ या स्पर्धेत फार तर तीन सामने खेळणार आहेत. ही स्पर्धा संपल्यावर काही दिवसांतच भारतीय पुरुष संघाची मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका आहे.
बीसीसीआयने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष; तसेच महिलांचा सर्वोत्तम संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुरुष संघात कर्णधार श्रेयस अय्यरसह, वैभव सूर्यवंशी, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आहेत.