सोलापूर : पंढरपुरातील पिराची कुरोली येथील भीमा नदीच्या पात्रात २० फुटी मगरीचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.ही मगर अधूनमधून पात्रा बाहेर शेतकऱ्यांच्या शेतातही दिसून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.या मगरीला पकडण्यास वन विभागाच्या पथकाला अपयश येत आहे.
बिबट्या मृत्युमुखी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील मौजे सुदगाव शिवारात तापी नदीच्या काठालगत असलेल्या शेतात एका बिबट्याचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. डुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात हा बिबट्या अडकला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
रेल्वेत १३ कोटींचे चरस
मुंबई : गाडी क्रमांक १९०३८ गोरखपूर- वांद्रे टर्मिनसमध्ये १३ किलोंहून अधिक चरस सापडले आहे. एक्स्प्रेसची लॉकिंग तपासणी करताना सर्वसामान्य डब्यातील एका बॅगेत चरस होते. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद बॅगेत आढळलेल्या ३१ पॅकेट चरसचे एकूण वजन १३ किलो ८३४ ग्रॅम असून त्याची बाजारभावानुसार अंदाजे किंमत १३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपये आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रेबीजच्या भीतीने आत्महत्या
कल्याण : कुत्रा चावल्यामुळे आता आपल्याला रेबीज होईल, या भीतीने एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका येथे घडली. अय्याज हमीद असे या तरुणाचे नाव असून, तो एका खासगी बँकेत नोकरीस होता. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.






