वांद्रे येथे प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम व्यावसायिकाकडे साडेपाच लाखांची भिक्षा मागणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या तृतीयपंथीयांच्या टोळीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौघांना अटक करून नोटीस देत सोडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील हिल रोड येथे जी. व्ही. पी. रियालिटी कंपनीने गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला आहे. २१ फेब्रुवारीला मुहूर्ताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी तेथे दोन तृतीयपंथीय पोहोचले व ‘मालकाला साडेपाच लाख रुपये द्यायला सांग, अन्यथा मुहूर्ताचा कार्यक्रम उधळून लावू,’ अशी धमकी दिली. व्यावसायिकाने वांद्रे पोलिसांना कळविले. पोलिसांनी तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. सुगंधी पिल्ले, नागराज पिल्ले, प्रिया पोन्नुस्वामी, विमला अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.






