यंदा लाल मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने दर वाढले आहेत. सध्या ब्याडगीचा एक किलोचा दर ५०० रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त झालेला पाऊस, लांबलेला पावसाळा यामुळे यंदा लाल मिरचीचे उत्पादन कमी झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या दरात सरासरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब्याडगी आणि इतर सुक्या लाल मिरचीची मुख्य आवक हंगामानुसार जानेवारी ते एप्रिल यादरम्यान जास्त प्रमाणात सुरू होते. काही भागांत काढणी थोडी लवकर किंवा उशिरा झाल्यास आवक मेपर्यंत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत मसाले तयार करण्यात येतात. त्यामुळे या काळात लाल मिरचीला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. ब्याडगीसह गुंटूर, तेजा, खुडवे या मिरचांचे दरही वाढले आहे.
‘यंदा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतील लागवडीवर परिणाम झाला आहे. तेजा आणि ब्याडगी या प्रकारच्या मिरचीला मोठी मागणी असते. ब्याडगी मिरचीचा प्रति किलोचा दर ५५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मिरचीचे दर सध्या तेजीत राहणार असून, नवीन हंगामातील आवक सुरू झाल्यानंतर दरात घट होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.
‘आवक कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मसाला तयार करण्यासाठी लागणारे धणे, जिरे; तसेच खडा मसाल्याच्या किमतीत वाढ झाली आहे,’ असे मिरची व्यापारी राजेंद्र गुगळे यांनी सांगितले.






