अवघ्या १५ दिवसांपूर्वी भारतीय ज्युनियर संघाच्या वर्ल्ड कप वनडे विजेतेपदात मोलाची कामगिरी केलेल्या अभिज्ञान कुंडूने मुंबईच्या २३ वर्षाखालील संघातून खेळताना १५९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे मुंबईचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश सोमवारी निश्चित झाला आहे. संघाची गरज आपण पूर्ण केली याचे समाधान अभिज्ञानला होते.
कांदिवली जिमखान्यावर सुरू असलेल्या या सामन्यांत अंगक्रिश रघुवंशी (९२), आयुश जेठवा (१५१), मानन भट्ट (१२०) यांच्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. मात्र अभिज्ञानने १५९ धावांची खेळी केली. तो मुंबईचा बाद झालेला सातवा फलंदाज होता. त्याच्या खेळीमुळे मुंबईने ७ बाद ६१६ अशी मजल तिसऱ्या दिवसअखेर मारली आहे. मुंबईकडे आता ३७६ धावांची आघाडी आहे.
अभिज्ञानसाठी ही खेळी वैयक्तिकदृष्ट्याही मोलाची आहे. हे त्याचे २३ वर्षाखालील गटाच्या स्पर्धेतील पहिलेच शतक आहे. ही कामगिरी या नवी मुंबईतील युवकाने केवळ दुसऱ्याच सामन्यात केली. त्याने मानन भटसह तिसऱ्या विकेटसाठी १८१ चेंडूंत ७७, पाचव्या विकेटसाठी सूर्यांश शेडगेसह ७० चेंडूंत ७५ आणि सातव्या विकेटसाठी कार्तिक कुमारसह १२२ चेंडूंत ८५ धावा जोडल्या आणि मुंबईला सहाशेपार नेले.
स्कोअरबोर्ड : कर्नाटक २४० वि. मुंबई १८७ षटकांत ७ बाद ६१६ (अंगक्रिश रघुवंशी ९२ - १७७ चेंडूंत ११ चौकार व १ षटकार, आयुश जेठवा १५१ - ३५३ चेंडूंत २० चौकार व १ षटकार, मानन भट्ट १२० - २३८ चेंडूंत १५ चौकार व १ षटकार, अभिज्ञान कुंडू १५९ - २१४ चेंडूंत १७ चौकार व ५ षटकार, सूर्यांश शेडगे २१, कार्तिक कुमार खेळत आहे २८, समित द्रविड २०-१-७१-२, अनिश्वर गौतम ७-१-१२-२).






