वर्ल्ड कप वनडे क्रिकेट स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला संघ आज, मंगळवारी प्रथमच क्रिकेटच्या या प्रकारातील लढतीस सामोरा जात आहे. यजमान ऑस्ट्रेलियाशी दोन हात करताना हरमनप्रीत कौर आणि कंपनीचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.
अर्थातच जगज्जेतेपद आणि दोनच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत नमवून पटकावलेले टी-२० मालिका जेतेपद. भारताने गेल्यावर्षी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील वर्ल्ड कप उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले होते. भारतीय संघात अरुंधती रेड्डी, भारती फुलमाळी आणि श्रेयांका पाटील यांच्याऐवजी काशवी गौतम, हर्लीन देओल आणि प्रतिका रावल यांचा संघात समावेश करण्य़ात आला आहे. सलामीची स्टार फलंदाज स्मृती मानधना टी-२०मधील यशोमालिका वनडेतही कायम राखण्याच्या प्रयत्नांत आहे.
‘आम्हाला कोणाला हरवतो आणि कुठे हरवतो, हे महत्त्वाचे नाही. आम्हाला फक्त सातत्याने जिंकायचे आहे आणि अव्वल स्थान कायम राखायचे आहे’, असे स्मृती मानधना म्हणाली. या मालिकेतील दुसरी वनडे २७ फेब्रुवारीला आणि तिसरी वनडे एक मार्चला होबार्ट येथे होईल. आजचा सामना सकाळी ९.२० पासूनसुरू होईल.






