इराणमधील बिघडती सुरक्षा व्यवस्था आणि वाढता तणाव लक्षात घेता, केंद्र सरकारने तिथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना उपलब्ध साधनांद्वारे तातडीने देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. व्यावसायिक विमानांसह इतर कोणत्याही उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून भारतीयांनी इराणमधून बाहेर पडावे, असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
तेहरानमध्ये पुन्हा सुरू झालेली निदर्शने आणि आखाती देशावर अमेरिकेकडून लष्करी हल्ला होण्याची वाढती भीती, या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने ही नवी सूचना जारी केली आहे. गेल्या महिन्यात आंदोलकांवरील कठोर कारवाईनंतर, आता इराणमधील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधी आंदोलने सुरू केल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.
जानेवारीतील अधिकृत आकडेवारीनुसार, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटकांसह सुमारे दहा हजारांहून अधिक भारतीय नागरिक सध्या इराणमध्ये वास्तव्यास आहेत. दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पाच जानेवारी रोजी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आणि इराणमधील सध्याची बदलती परिस्थिती पाहता, तिथे असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर बाहेर पडावे. आंदोलने किंवा निदर्शने होत असलेल्या भागांत जाणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.






