जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत झालेल्या बैठकीवरून शहरातील राजकारण तापले आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाल्यानंतर काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवला आहे. शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत यांनी मनपा आयुक्तांना पत्र देत बैठकीच्या वैधतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शेखावत यांनी पत्रात नमूद केले आहे की, महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून तिच्या बैठकीस कोण अध्यक्षस्थानी बसू शकते, याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मध्ये स्पष्ट तरतुदी आहेत. सध्या कोणतेही अधिकृत पद नसलेल्या व्यक्तीला अध्यक्षस्थानी बसवून बैठक घेणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, याबाबत खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या बैठकीस आयुक्त, महापौर आणि सत्ताधारी पक्षाचे सभागृह नेते उपस्थित होते. मात्र उपमहापौर, विरोधी पक्षनेते व इतर पक्षांच्या गटनेत्यांना निमंत्रण का देण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.






