वर्ल्ड कप वनडे क्रिकेट स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला संघ आज, मंगळवारी प्रथमच क्रिकेटच्या या प्रकारातील लढतीस सामोरा जात आहे. यजमान ऑस्ट्रेलियाशी दोन हात करताना हरमनप्रीत कौर आणि कंपनीचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.
कारण? अर्थातच जगज्जेतेपद आणि दोनच दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत नमवून पटकावलेले टी-२० मालिका जेतेपद. भारताने गेल्यावर्षी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील वर्ल्ड कप उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले होते.
ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी महिला खेळाडूंपैकी असणाऱ्या एलिसा हिली ही या मालिकेनंतर वनडे क्रिकेटमधून निरोप घेणार आहे. त्यामुळेही या मालिकेचे महत्त्व जास्त आहे. तसेच भारताविरुद्ध ६ मार्चपासून पर्थ येथे सुरू होणारा कसोटी सामना हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा असेल.
भारतीय संघात अरुंधती रेड्डी, भारती फुलमाळी आणि श्रेयांका पाटील यांच्याऐवजी काशवी गौतम, हर्लीन देओल आणि प्रतिका रावल यांचा संघात समावेश करण्य़ात आला आहे. सलामीची स्टार फलंदाज स्मृती मानधना टी-२०मधील यशोमालिका वनडेतही कायम राखण्याच्या प्रयत्नांत आहे.
सामन्याची वेळ : सकाळी ९.२० पासून.








