यंदाच्या उन्हाळ्यातही शहरवासीयांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. वाढीव दोनशे एमएलडी पाणी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जॅकवेल आणि मुख्य जलवाहिनीतील त्रुटी दूर करण्यासाठी किमान दोन महिने लागतील. त्यानंतर चाचणीसाठी एक ते दीड महिना लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. हे काम करण्यासाठी प्राधिकरणाने जीव्हीपीआर या कंपनीची नियुक्ती केली आहे. या कामाबद्दल गेल्या आठवड्यात हायकोर्टात झालेल्या सुनावणीनुसार पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करून त्याचा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला. यानुसार जॅकवेल आणि मुख्य जलवाहिनीच्या कामात त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले.
जॅकवेलच्या स्वच्छतेचे काम अत्यंत बारकाईने करावे लागणार असल्यामुळे त्याला विलंब होत असल्याचा दावा कंत्राटदार कंपनीने केला आहे. मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचे काम काही ठिकाणी बाकी आहे. ते पूर्ण झाल्यावर ३८ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी स्वच्छ करावी लागेल. जलवाहिनीत पाणी भरून ती धुवावी लागेल. जॅकवेल आणि मुख्य जलवाहिनीतील त्रुटी दूर करणे, ३८ किलोमीटरची जलवाहिनी स्वच्छ करणे यासाठी उन्हाळ्याचा पूर्ण काळ लागेल. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीबाणीला सामोरे जावे लागेल, असे मानले जात आहे.
सध्या शहराला १३५ ते १४० एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे सहाव्या, सातव्या दिवशी अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे पाणीपुरवठ्यातील गॅपदेखील वाढू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.









