‘औद्योगिक वाढ, डिजिटल पायाभूत सुविधा आणि एआय-आधारित डेटा सेंटरमुळे जागतिक ऊर्जा मागणी वाढत आहे. त्यामुळे उर्जा सुरक्षेसोबतच परिणामकारक कार्बन कपात साधणे हेच खरे आव्हान आहे,’ असे मत उद्योगधुरिणांनी व्यक्त केले.
एसपीई एमआयटी-डब्ल्यूपीयू विद्यार्थी शाखेच्या प्रमुख उपक्रमांपैकी २९व्या वार्षिक ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इन्टरॅक्शन प्रोग्राम’मध्ये (एआयआयआयपी-२६) ‘रिस्किल, रिवायर, रिइग्नाइट : कमी कार्बन उत्सर्जनासाठी अभियांत्रिकी कार्यबल’ या विषयावरील पॅनेल चर्चेत अभ्यासकांनी हे मत व्यक्त केले. कार्बन व्यवस्थापन आणि कमी-उत्सर्जन कार्यपद्धतींवर या वेळी चर्चा करण्यात आली.
‘जगाला सर्व प्रकारच्या ऊर्जेची गरज आहे; मात्र अधिक कार्यक्षमतेतून उत्सर्जन कमी करणे हेच पहिले पाऊल असेल. डिजिटल साधनांचा वापर करून संभाव्य समस्यांचा अंदाज घेणे आणि अनावश्यक ऊर्जा वापर टाळणे गरजेचे आहे,’ असे बीपी टेक्निकल सोल्युशन्स इंडियाच्या प्रमुख मॉली क्रोमा यांनी सांगितले.
‘ ऊर्जा संक्रमण ही टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया असून, तेल-गॅस क्षेत्राची भूमिका कायम राहील; मात्र कार्बन साठवणूक/वापर प्रकल्प, हायड्रोजन, भू-औष्णिक ऊर्जा आणि कार्यक्षम संचालन यांमुळे कमी-उत्सर्जन भविष्याचा मार्ग ठरेल,’ असे ‘एक्सॉनमोबिल’चे इयान मॅकफी यांनी सांगितले.
‘कार्बन कॅप्चर प्रकल्पांची रुची वाढत आहे. सीओटू साठवणुकीसाठी भूयांत्रिकी अभ्यासाची गरज आहे,’ असे बेकर ह्युजेसचे प्रदीप शुक्ला यांनी सांगितले.
अभियंत्यांनी कार्बनचा स्रोत, मॉनिटरिंग तंत्रज्ञान, नियामक चौकट आणि उत्सर्जन कमी करण्याचे मार्ग समजून घेणे आवश्यक असल्याचे शेवरॉनचे चेतन चव्हाण यांनी सांगितले. ‘ऊर्जा क्षेत्राचे भविष्य कार्बन नियंत्रणावर अवलंबून असेल,’ असे विश्वास कोरम सॉफ्टवेअरच्या तितिक्षा मुखर्जी यांनी सांगितले.






