निवडणूक आयोगाने सोमवारी तमिळनाडूच्या अंतिम मतदारयाद्या प्रसारित केल्या. यानुसार विविध श्रेणींअंतर्गत ७४.०७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. राज्यात आता ५.६७ कोटी मतदार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनायक यांनी दिली. पटनाईक यांनीच या याद्या प्रसारित केल्या आहेत.
‘मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणीआधी (एसआयआर) राज्यात मतदारांची संख्या ६.४१ कोटी होती. एसआयआर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ९७.३७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. परंतु सुधारणा आणि सुनावणी प्रक्रियेनंतर ७४ लाख सात हजार २०७ नावे वगळण्यात आली. १८-१९ वयोगटातील ७.४० लाख नव्या मतदारांचा अंतिम मतदारयाद्यांमध्ये समावेश करण्यात आला’, अशी माहिती पटनायक यांनी दिली. ‘या याद्या सातत्याने अद्ययावत करण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू केली जाईल’, असेही त्यांनी सांगितले.
चेंगलपट्टू जिल्ह्यातील शोलिंगनल्लूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५,३६,९९१ मतदार आहेत, त्यानंतर तिरुवल्लूर जिल्ह्यातील अवदी येथे ४,२८,७७२ मतदारांची नोंद आहे. चेन्नई जिल्ह्यातील हार्बर विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी १,१६,८९६ मतदार आहेत. त्यानंतर राज्याच्या राजधानीतील एग्मोर (एससी) मतदारसंघात १,३४,८७९ मतदार आहेत.






