आपल्याला गंगा नदीचे दर्शन होते मात्र ती स्वर्गातून पृथ्वीवर आणणाऱ्या भगीरथांना आपल्याला बघता येत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घडविणाऱ्या भगीरथांच्या बाबतीतही हे लागू आहे. शंभर वर्षे गाठलेला संघ आज आपण जवळून बघतो आहे. हा संघ घडविणाऱ्या भगीरथांचेही कार्य समजून घेणे गरजेचे आहे. आणि ही गरज ‘ संघ गंगा के भगीरथ ’ हे नाटक पूर्ण करत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.
ताराराणी फाउंडेशनच्यावतीने ‘संघ गंगा के भगीरथ’ या हिंदी नाटकाच्या ७५ व्या प्रयोगाचे आयोजन सोमवारी वनामती सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या नाटकाच्या औपचारिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी, उद्योजक आणि विश्वराज फाऊंडेशनचे प्रमुख सारंग लखानी, विको लेबॉरटरीजचे देवेश पेंढारकर, किशोर बावणे, आदित्य अनघा कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष अनघा सराफ, भारतीय सिंधी सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष घनश्याम कुकरेजा, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, लघुउद्योग भारतीचे उपाध्यक्ष ताराचंद गोयल, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ नागपूर ब्रांच हेड प्रसाद पुल्लीवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रयोगाला लोढा ग्रुपचे सहकार्य लाभले होते.
‘संघ गंगा के भगीरथ’ हे नाटक व्यावसायिक स्वरुपाचे नाही मात्र देशभक्तांसाठी अशा नाटकांचे मूल्य अमाप आहे. हे नाटक १०० प्रयोग पूर्ण करेल,’ असेही जोशी म्हणाले. नाटकाचे दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी प्रास्ताविक केले आणि देशभरात विविध राज्यात या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. दीपाली घोंगे यांनी संचालन केले, तर नीलिमा बावणे यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.
औपचारिक कार्यक्रमानंतर नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. ‘संघ गंगा के भगीरथ’ या नाटकातून रा. स्व. संघाच्या प्रथम तीन सरसंघचालकांच्या जीवनाचे आणि संघाच्या प्रवासाचे दर्शन या नाटकातून घडवण्यात आले आहे. रवींद्र भुसारी हे या नाटकाचे मार्गदर्शक आहेत. विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले आहे. नेपथ्य सतीश पेंडसे यांचे असून संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस यांचे होते. नाटकाच्या सूत्रधार राधिका देशपांडे होत्या तर निर्मिती साहाय्य ॲड. रमण सेनाड, नीलिमा बावणे आणि अरुणा पुरोहित यांचे होते.






