राळेगाव तालुक्यातील झरगड येथे सोमवारी दुपारी वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाले आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. झरगड शिवारात चंद्रभान पचारे यांच्या शेतात हे मजूर काम करीत होते. दुपारी अचानक विजेचा कडकडाट व पावसाला सुरुवात झाली. मजूर पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबले. त्याच झाडाच्या जवळ वीज कोसळल्याने चंद्रभान पचारे, गणेश नान्हे, विमल पडिले, वंदना पडिले व सुनीता राऊत हे गंभीर जखमी झाले. सर्वांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. नापिकीला सामोरे जात असतानाच आता हे नवे संकट आल्याने शेतकरी हादरला आहे. नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून तातडीची भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रविवारच्या रात्रीपासूनच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. सोमवारच्या मध्यरात्रीनंतर विजांचा कडकडाट व हलक्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्याने शेतात काढणीसाठी ठेवलेला हरभरा, तूर, मूग आदी कडधान्य, पिके भिजली. फळबागांनाही या पावसाचा फटका बसला असून, आंबा व इतर बागायती पिकांवरील मोहोर गळण्याची शक्यता आहे. नागपुरात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे काही काळ वीजही गायब झाली होती. भंडाऱ्याही सरींचा जोर अधिक होता. सिरोंचात सोमवारी सायंकाळच्या सुमारास तुरळक सरी कोसळल्या.
यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. रविवारी रात्री व सोमवारच्या सकाळी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राळेगाव, मारेगाव, कळंब, केळापूर, उमरखेड, महागाव आणि दिग्रस तालुक्यातील अनेक गावांना या पावसाचा फटका बसला. उमरखेड तालुक्यातील मुळावा, तिवरंग, झाडगाव, विडूळ; महागाव तालुक्यातील वाकान, कोनदरी, वनोली, चिंचपाड या गावांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. काही ठिकाणी गहू व हरभरा काढणीचे काम सुरू होते. राळेगाव तालुक्यातील काही गावांत गारपीट झाल्याने नुकसानीचा आकडा वाढणार आहे.
५३४ हेक्टरला फटका
महसूल विभागाने शेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. यात ५३४ हेक्टरवरील गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. त्यात केळापूर १५ हेक्टर, उमरखेड ६५ हेक्टर, दिग्रस २५० हेक्टर, मारेगाव २०४ हेक्टरवरील नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासह इतर तालुक्यांतही नुकसानीची पाहणी सुरू आहे.






