मठ, आखाडे, मंदिरे, विश्व हिंदू परिषदेचे नेते अयोध्येत उपस्थित
अयोध्येत राम मंदिराच्या देणगीतील चोरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मठ, मंदिरे आणि आखाड्यांमधील सुमारे २५० साधू आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी अयोध्येचा सन्मान आणि प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याबाबत चर्चा सुरू केली. या बैठकीत सहभागी झालेल्यांनी मंदिरातील धार्मिक विधींमध्ये 'वैष्णव-रामानंदी' परंपरेचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला.
'मनिराम दास छावणी' येथील 'श्री राम सत्संग भवन'मध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास ही बैठक सुरू झाली. ‘अयोध्येची प्रतिमा पुनर्स्थापित करणे’ हा चर्चेचा मुख्य विषय होता. भाविकांनी दिलेल्या देणगीच्या कथित चोरीमुळे निर्माण झालेला राजकीय वाद आणि त्याचा ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्रतिष्ठेवर होणारा परिणाम’ याबद्दल सहभागींनी चिंता व्यक्त केली. या बैठकीचा मुख्य विषय राष्ट्र आणि सनातन असेल, असे महंत नृत्य गोपाल दास यांचे उत्तराधिकारी कमल नयन दास यांनी सांगितले. या बैठकीत अयोध्येतील विविध मठ आणि मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत, असे ते म्हणाले.मंदिरातील सर्व धार्मिक विधी, उत्सव, समारंभ आणि पूजापद्धती या ‘रामानंदी’ परंपरेनुसारच पार पाडल्या जाव्यात, अशी यंत्रणा ट्रस्टच्या माध्यमातून विकसित करणे, हा बैठकीच्या अजेंड्यावरील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे ते म्हणाले. ‘रामानंदी’ परंपरा हा वैष्णव पंथाचा एक भाग आहे; यात भगवान श्रीरामांची ‘परमेश्वर’ म्हणून उपासना केली जाते आणि या पंथाची परंपरा संत रामानंद यांच्याशी जोडलेली आहे. अयोध्येतील इतर मंदिरांप्रमाणेच श्रीराम मंदिरातही याच परंपरेचे पालन केले जाते आणि त्याअंतर्गत आरती व नैवेद्य यांसारखे दैनंदिन विधी केले जातात.