‘दर पाडण्यासाठी निकृष्ट हळदीची साठवणूक’

महाराष्ट्र टाइम्स
‘दर पाडण्यासाठी निकृष्ट हळदीची साठवणूक’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘बाजारपेठेत हळदीचे दर पाडण्यासाठी राज्यातील गोदामांमध्ये काही व्यापाऱ्यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाची हळद साठवली जात आहे. ती पुढे करून दर पाडले जात आहेत,’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला. ‘राज्य वखार महामंडळाने गोदामातील हळदीची गुणवत्ता तपासून हळद उत्पादकांची नाडणूक थांबवावी,’ अशी मागणी त्यांनी केली.

या संदर्भात शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेतली. ‘यंदा हळदीचे उत्पादन कमी आहे. प्रतिक्विंटल २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत दर अपेक्षित होता. काही मूठभर व्यापारी वायदेबाजाराद्वारे दर मुद्दाम पाडत आहेत. कमी दरात हळद विकावी लागत आहे,’ असा आरोप शेट्टी यांनी केला.
त्यावर, ‘गोदामांमधील हळदीच्या गुणवत्तेची तपासणी करू,’ असे आश्वासन दिवेगावकर यांनी दिले.