‘बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने वाढत असताना पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे,’ असे मत कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. त्या सोनारी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.
कार्यक्रमात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक संरक्षण , रोग व कीड व्यवस्थापन, शासकीय कृषी योजना; तसेच हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. जिंतूरकर यांनी विविध पिकांवरील रोग व किडींची लक्षणे, त्यांचे वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती याबाबत माहिती दिली. हुमनी आणि दुग्ध व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. या प्रसंगी रवींद्र दाभाडे, सांडू दाभाडे, खुशाल दाभाडे, भगवान दाभाडे, आत्माचे मकरंद नन्नावरे, जगदीश जाधव, ज्ञानेश्वर फुले आदींसह शेतकरी उपस्थित होते.











