राज्यात नव्या अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असतानाच, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील बदल सहज लक्षात यावेत, यासाठी यंदा शाळा सुरू होताच ‘ सेतू अभ्यास ’ राबविण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा २१ दिवसांचा अभ्यासक्रम असून तो पूर्ण झाल्यानंतर नियमित अध्यापनाला सुरुवात होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. यापैकी तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासाची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये हा अभ्यासक्रम शाळा सुरू झाल्यानंतर राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात येत असून, अभ्यासक्रमाची पीडीएफ प्रत एससीईआरटीच्या वेबसाइटवरही उपलब्ध करण्यात आली आहे.











