तीन भावांचा नदीत बुडून मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईहून कोकणात सुट्ट्यांसाठी आलेले तीन सख्खे भाऊ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे दुर्दैवी घटनेला बळी पडले. जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आकाश, नरेश आणि कैलास कांबळे या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. एका भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांचाही जीव गेला.

tragic end of three brothers drowned in jagbudi river

मुंबईतून कोकणात गावी सुट्टीत नातेवाईकांकडे आलेल्या तीन सख्ख्या भावंडांचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीत पोहताना मृत्यू झाला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आकाश रामा कांबळे (२३), नरेश रामा कांबळे (२२) आणि कैलास रामा कांबळे (१७) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे चेंबूर येथील मुकुंदनगरचे रहिवासी असून खेड शहरातील एकविरानगर येथे नातेवाईकांकडे आले होते.

बुधवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास महाड नाक्याजवळील जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. तिघांपैकी एक जण खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. आपल्या भावाला मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यासाठी उरलेले दोघेही त्याच्या मदतीला धावले. यावेळी या दोघांचाही मृत्यू झाला.