शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील २५ ते ३० आदिवासी कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. मे आणि जून या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नाही. यासंदर्भात तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नाही. ग्रामस्था धान्यासाठी अनेकदा दुकानात हेलपाटे घालतात. मात्र दुकानदार धान्य नसल्याचे सांगतो,असे ग्रामस्थांनी तक्रारीत नमूद केले आहे.
पाऊस सुरू झाला की आदिवासींना रोजगारही उपलब्ध होत नाही. अशावेळी रेशन दुकानातून मिळणारे धान्य त्यांच्यासाठी आवश्यक आहे. मात्र धान्य मिळत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. सरपंच जिवा भला यांनी यासंदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र लिहिले असून त्यात आदिवासी कुटुंबांची होणारी अडचण मांडली आहे.

