नव्या शैक्षणिक पर्वाच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह १,१२८ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हजेरी लावणार आहेत.
आज शाळकरी मुलांचे स्वागत वर्ग एक आणि दोनचे अधिकारी स्वतः उपस्थित राहून करणार आहेत. जिल्हाधिकारी प्रसाद हे नाशिक महापालिकेच्या शिवाजीनगरमधील शाळा क्रमांक २१ येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. याशिवाय सर्व नियुक्त अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी वेळोवेळी शाळेला भेट देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, याबाबत आवश्यक उपाययोजना सुचवतील. शाळेच्या भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधांचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी, आदींबाबत मार्गदर्शन करतील.
धोकादायक बांधकाम, वापराअभावी, पाण्याअभावी बंद असलेली शौचालये यांसारख्या मुलभूत समस्या आढळून आल्यास, संबंधित यंत्रणेस तत्काळ पावले उचलण्याबाबत सूचना करतील.




