‘ महाभारत सृष्टी’ प्रस्तुत आणि ‘ महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब ’ व प्रा. संजय साळवे आयोजित ‘ स्वरार्जुन : एक सांगीतिक महाभारत प्रवास’, या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार २० जून रोजी दुपारी १ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे. कै. दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ हे सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे.
या कार्यक्रमाला गायक सोमेश नार्वेकर, धनंजय म्हसकर आणि गायिका केतकी चैतन्य यांच्या स्वरांचा साज असेल. माधुरी नाईक यांचे संगीत, कवी श्रीरंग (श्रीपाद सहस्त्रबुद्धे) यांचे शब्द आणि विघ्नेश जोशी यांचे निवेदन असणार आहे. या प्रयोगाची संकल्पना व निर्मिती वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांची आहे. संगीत संयोजन सोमेश नार्वेकर व अमेय ठाकूरदेसाई यांनी केले आहे. मुख्य कलाकारांसोबतच अमेय ठाकूरदेसाई (तबला), हनुमंत रावडे (पखवाज), गंधर्व पाटील व संतोष पेडेकर (ताल वाद्य), विजय तांबे (बासरी), पंडित उमाशंकर शुक्ल (सतार) आणि झंकार कानडे व अक्षय कावळे (कीबोर्ड) यांची साथसंगत लाभेल. हा सांगीतिक प्रवास आजच्या काळातील विद्यार्थी, तरुण आणि मध्यमवयीन अशा प्रत्येक पिढीला डोळसपणे विचार करायला लावणारा आहे.
रसिकांनी या सांगीतिक प्रवासाचा आनंद घेण्यासाठी नक्की उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रा. संजय साळवे (९०९६८९३५१०) यांनी केले आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्री बुक माय शो आणि व्रजांग ॲपवर नाममात्र दरात सुरु आहे.





