अंबरनाथ शहरातील हवेची गुणवत्ता सुधारावी तसेच, वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनसीएपी) आणि १५व्या वित्त आयोगांतर्गत अंबरनाथ नगरपालिकेला एकूण १३.९६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हरित समशानभूमी ते चार्जिंग स्टेशन ते रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी चार लहान यंत्रसामग्री अशा विविध उपाययोजनांवर आत्तापर्यंत ११.७२ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. मात्र यातील कोट्यवधी रुपयांच्या अनेक यंत्रणा वापराविना धूळखात पडून आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांचा वापर होऊनही शहरातील हवेच्या गुणवत्तेत नेमका किती फरक पडला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
अंबरनाथ शहरात वायू आणि जल प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात होत्या. त्यावर उपाययोजना करण्यात अंबरनाथ नगरपालिका गेली काही वर्षे अपयशी ठरत होती. त्यात केंद्र सरकारतर्फे सन २०१९मध्ये प्रदूषित शहरांमधील वायूप्रदूषण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा योजना राबवण्यात आली. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेला केंद्र सरकारकडून १३.९६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. यासाठी एकूण ११.७२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर, उर्वरित जवळपास दीड कोटी रुपयांची कामे प्रलंबित आहेत. मात्र इतका निधी खर्च करून यंत्रणा उभारूनही शहरातील प्रदूषण किती कमी झाले, हा संशोधनाचा विषय आहे.








