(पान एकवरून)
आहे का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अतिप्रमाणात उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अतिशय खालावते. परिणामी मूत्रपिंडे निकामी होऊन मृत्यू ओढवतो. तर अन्नातील कुजण्याच्या प्रक्रियेमधील रासायनिक घटकांमुळे डोक्यामध्ये, आतड्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रत्येकाच्या शरीराची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते, त्यामुळे या चारही जणांचा मृत्यू या कलिंगड आणि बिर्याणीचे सेवन केल्यानंतर किती वेळात झाला, हे तपासले जात आहे. शरीरात विषारी द्रव्ये किंवा रासायनिक घटकांचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्यासाठी किती वेळ लागला याचा निष्कर्ष त्यावरून काढण्यात येणार आहे.
मायक्रोबायोलॉजी, हिस्टोपॅथालॉजी, फोरेन्सिक या विभागांच्या समन्वयाने मृत्यूचे नेमके कारण काय आहे यासंदर्भात अंतिम निष्कर्ष काढण्यात येणार आहे. कलिना येथील प्रयोगशाळेमध्ये काही नमुने पाठवण्यात आले आहेत, तर हिस्टोपॅथालॉजी विभागाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. हा अंतिम अहवाल पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रक्रियेशी संबंधित तज्ज्ञांनी दिली.
प्राथमिक अहवालात त्यांच्या शरीरातील मेंदू, हृदय आणि आतडी यांसारखे मुख्य अवयव हिरवट रंगाचे झाल्याचे आढळले आहे. अन्न विषबाधेत अशा प्रकारचे बदल सहसा दिसून येत नाहीत. जेव्हा शरीरातील अनेक अवयवांमध्ये एकाच वेळी असे बदल दिसतात, तेव्हा तो एखाद्या अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम असू शकतो; हा घटक नेमका कोणता यासाठीही प्रगत रासायनिक विश्लेषण तपासण्या करण्यात येणार आहेत.


