(पान १ वरून)
विजय यांची भाजप किंवा ‘एनडीए’चा पाठिंबा घेण्याची इच्छा नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यपालांशी झालेल्या भेटीनंतर विजय यांनी निलंकरई येथील आपल्या निवासस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कायदेशीर सल्लागारांशी चर्चाही केली. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेसंदर्भात सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात दाद मागून कायदेशीर पर्यायांची चाचपणी करावी, अशी सूचना ‘ टीव्हीके ’च्या ज्येष्ठ नेत्यांनी या वेळी केल्याचेही समजते. भाजपप्रणीत ‘एनडीए’मध्ये असलेल्या अण्णा द्रमुकसह आपापल्या आमदारांना ‘सांभाळण्या’साठी राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुरू होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. अण्णा द्रमुकने आपल्या आमदारांना एका रिसॉर्टवर एकत्र ठेवले आहे. जोपर्यंत शपथविधी समारंभ पार पडत नाही, तोपर्यंत चेन्नईतच थांबण्याचा निर्णय विजय यांनी घेतला आहे.
‘लोकशाही संकेत पाळावेत’
चेन्नई : माकपचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी गुरुवारी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना आवाहन केले, की त्यांनी लोकशाही संकेतांचे पालन करून, ‘टीव्हीके’ला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करावे, तर केंद्र सरकार आणि राज्यपाल ‘टीव्हीके’ला सत्ता स्थापन करण्यापासून रोखत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
‘काँग्रेसचा खरा चेहरा उघड’
चेन्नई : तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसने ‘तमिळगा वेत्री कझघम’ (टीव्हीके) आणि तिचे प्रमुख विजय यांना पाठिंबा जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. या निर्णयावर ‘द्रमुक’ने काँग्रेसवर टीकेचे आसूड ओढले आहेत. ‘काँग्रेसच्या निर्णयाने त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे,’ अशी टीका ‘द्रमुक’चे खजिनदार टी. आर. बालू यांनी बुधवारी केली.









