दीड दशकानंतर पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये एकतेची गरज बोलून दाखविली असली, तरी त्यांचे हे आवाहन आघाडीतील पक्षांनी झटकले आहे. बॅनर्जी यांच्या भाजपविरोधी एकतेच्या ताज्या मोहिमेला काँग्रेस आणि माकपने थंड प्रतिसाद दिला आहे.
डाव्या आणि अति-डाव्या पक्षांसह सर्व विरोधी पक्षांना भाजपविरोधात एक समान व्यासपीठ तयार करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना, ‘भाजप हाच आपला मुख्य शत्रू आहे. आता माझे ध्येय स्पष्ट असून ‘इंडिया’ला अधिक मजबूत करेन,’ असे ममता म्हणाल्या. मात्र, त्यांनी ज्या विरोधी पक्षांना बरोबर घेण्यास बंगालमध्ये नकार दिला होता, ते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत नाहीत. माकपने त्यांचे आवाहन त्वरित फेटाळून लावले.






