पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबई ते शिर्डीपर्यंतचा प्रवास ‘ वंदे भारत एक्स्प्रेस ’ने पूर्ण केला. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देताना, प्रवासादरम्यान सरकारी कामकाज पार पाडत, मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या कृतीतून लोकांसाठी उदाहरण घालून दिले.
पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:च्या कृतीतून त्याला तत्काळ प्रतिसाद देत, मागील आठवड्यात ‘वर्षा’ निवासस्थान ते विधानभवन व मंत्रालय असा प्रवास दुचाकीवरून पार पाडला. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या वाहनांच्या ताफ्यातही घट केली आहे. मंत्री,अधिकारी यांचे परदेश दौरे त्यांनी बंद केले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी नियोजित असलेल्या शिर्डी दौऱ्यावर जाताना, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पसंती दिली. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी होते.
विशेष म्हणजे, प्रवासाच्या पाच-सहा तासांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी कामकाजाच्या विविध सरकारी फाइल हातावेगळ्या केल्या. त्यासोबतच फोनवरून विविध सरकारी अधिकाऱ्यांना कामांसबंधी सूचना दिल्या.







