‘सध्या महाराष्ट्रातील एकाही नेत्यासमोर उद्दिष्ट नाही. महाराष्ट्रासाठी ‘ब्लू प्रिंट’ सांगू शकेल, असा एकही नेता नाही,’ अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चारित्र्य चांगले आहे. त्यांच्याकडे ध्येय आहे. मात्र, त्यांच्यासोबतचा एकही नेता काम करताना दिसत नाही,’ अशी टीका त्यांनी केली.
सहकारनगर भागातील रौप्यमहोत्सवी सहजीवन व्याख्यानमालेचे उद्घाटन दमानिया यांच्या ‘कैफियत सामान्य माणसाची’ या विषयावरील व्याख्यानाने झाले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, उदय कुलकर्णी, रवींद्र खरे, विजय ममदापूरकर उपस्थित होते.
‘राजकीय पक्षांमुळे महाराष्ट्रातील घराघरांत मतभेद वाढले आहेत. घरातील मंडळी एकमेकांशी, नातेवाइकांशी बोलत नाही. मित्र एकमेकांशी बोलत नाही. सशक्त लोकशाहीसाठी विरोधी पक्षाची सध्या उणीव आहे. हिंदू-मुस्लिम प्रश्नावर राजकारण होत राहिले तर भवितव्य काय असेल,’ असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.









